मुंबई : मिठी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. धारावी येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळील या मिठी नदी पुलावरील कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ३०३ कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे मोठा फायदा होणार असून पावसाळ्यात मिठी नदीचा प्रवाह सुरळीत होईल. तसंच या पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मिठीवरील या पुलाचा मुंबई महापालिकेने विस्तृत आराखडा तयार केला आहे. डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली जुलै २००५ मध्ये आलेल्या अतिवृष्टीनंतर तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचं पात्र ६८ मीटरवरून १०० मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शीव-धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलांची पुनर्बांधणी करून त्यांची रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. ही कामं दोन टप्प्यांत करण्याचं नियोजन आहे. वांद्रे पूर्व (एच पूर्व वॉर्ड) येथील ड्राइव्ह इन थिएटरजवळून मिठी नदी जाते. या मिठी नदीवरुन जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे.
सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी आणि कलिना इथे जाण्यासाठी धारावी येथील हा पूल महत्त्वाचा मानला जातो. पुलावर त्याची पुलाची रुंदी कमी असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागल्यास पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवाहातही अडथळा येतो. त्यामुळे या पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या धारावी येथील जुन्या पुलाची रुंदी ९.३ मीटर आहे. ती आता ४८ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर लांबी १०८ मीटर असेल. यामुळे बीकेसी, शीव अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरळीत, सोपा होईल. एका कंत्राटदाराची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. पुलाची पुनर्बाधणी करण्यासाठी ३०३ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पूल २ वर्षांत उभारण्याचं उद्दिष्ट आहे. तर ३ वर्षे कंपनीकडूनच पुलाची देखभाल केली जाईल. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधूनच पुलाचं काम करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. जुना पूल पाडल्यास या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या पुलाच्या बाजूलाच दक्षिण दिशेला आणखी एका पुलाची उभारणी केली जात आहे. त्याच्या उभारणीनंतरच जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाची उभारणी केली जाईल.







