ठाणे : ठाणे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून अवकाश विज्ञानाची दारे खुली झाली असून, ९५०० हून अधिक विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना ISRO येथे अभ्यासदौऱ्याची संधी मिळाली आहे. २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून या शैक्षणिक सहलीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘ग्रामीण ते अवकाश’ हा संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा यामागील उद्देश आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडली असून, मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांना तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी येथील महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देण्याची संधी मिळणार आहे. Vikram Sarabhai Space Centre, Thumba Equatorial Rocket Launching Station, तसेच विविध संग्रहालये, प्लॅनेटेरियम आणि ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेत विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक व्यापक होणार आहे. २७ एप्रिल ते १ मे दरम्यान होणाऱ्या या सहलीसाठी सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या निवास, प्रवास व आरोग्याच्या सर्व सुविधा सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. सहलीवरून परतल्यानंतर हे विद्यार्थी आपले अनुभव इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार असून, त्यामुळे विज्ञानाबद्दलची आवड आणि प्रेरणा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






