वृत्तसंस्था : भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेले संबंध आता पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. बांगलादेशात राजकीय सत्तापालट होऊन ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ सत्तेत आल्यानंतर, गेल्या १८ महिन्यांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय ‘मैत्री बस’ सेवा अखेर मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा सुरू झाली. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना, विशेषतः ईशान्य भारतातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे ही बस सेवा खंडित करण्यात आली होती. १८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोलकाता-ढाका-आगरतळा आणि आगरतळा-ढाका-कोलकाता या मार्गांवर बस पुन्हा धावू लागली आहे. ही सेवा सुरू होणे हे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बस सेवेसोबतच व्हिसा केंद्रांवरील कामकाजही पूर्ववत होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील ‘लोकांशी लोकांचा संपर्क’ अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.







