मुंबई प्रतिनिधी : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने अलीकडेच दोघा रेल्वे पोलिसांना अटक केली. याआधीही विविध केंद्रीय व राज्य यंत्रणांनी मुंबईतून अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. अमली पदार्थाच्या प्रत्येक कारवाईत मुंबईचा उल्लेख आवर्जून येतोच. अमली पदार्थाची सर्वाधिक विक्री मुंबईतच होते का? देशाची आर्थिक राजधानीच अमली पदार्थांची बाजारपेठ कशी ठरतेय?
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना १४७६ कोटींचे २०७ किलो अमली पदार्थ (१९८ किलो क्रिस्टल मेथाअॅम्पिटामाईन म्हणजेच एमडी आणि ९ किलो उच्च प्रतीचे कोकेन) एका फळांच्या ट्रकमध्ये वाशी येथे सापडले. ही देशातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आणखी एका कारवाईत जवाहरलाल नेहरू (न्हावा शेवा) बंदर येथून ५०२ कोटी रुपये किमतीचे कोकेन हस्तगत केले. तेही फळांच्या बॉक्समधून पाठविण्यात आले होते. पॅरिसहून मुंबईत आलेले १५ कोटींचे मेथाअॅम्पीटामाईनही मुंबई विमानतळावरून महसूल संचालनालयाने ताब्यात घेतले. नौदल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाकडून १२० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त झाले. केंद्रीय यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात केलेली ही कारवाई. गेल्या अनेक महिन्यांतील कारवाईवर नजर गेली तर मुंबई हेच केंद्र बिंदू असल्याचे दिसून येते.
अमली पदार्थांविरोधातील कारवाईत सक्रिय असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्यानमार, थायलंड आणि लाओस हे देश ‘गोल्डन ट्रायँगल’ तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ‘गोल्डन क्रेसेन्ट’ संबोधले आहे. या देशांमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात होते. या चक्रव्यूहात भारताची हद्द अडकल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला मोकळे रान मिळाले आहे. पश्चिम भारतात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी होते तर म्यानमारमधून पूर्व भारतात हेरॉईनचा पुरवठा होतो. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरमार्गे तस्करी होते. प्रामुख्याने सीमेवरून किंवा हवाईमार्गे हा पुरवठा होत होता. आता जलमार्गाचा वापर केला जातो. गुजरातमधील मुंद्रा बंदरात सापडलेला तीन हजार किलोचा अमली पदार्थांचा साठा हा त्याचाच भाग होता. नेपाळ, बांगलादेश, भुतान, म्यानमार या देशांतून भारतात होणाऱ्या तस्करीमुळे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगला, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमार्फत दिल्ली व मुंबईत पुरवठा होतो.
देशातील सद्यःस्थिती..
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अफू म्हणजे खसखसची शेती. अफुच्या बोंडाला चिरा मारून त्यातून दूध काढले जाते. त्यावर प्रक्रिया करून त्याच्या चकत्या पाडतात त्याला अफिम म्हणतात. शासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन अशी शेती केली तरी तो माल शासनाला द्यावा लागतो. यावर अमली पदार्थ प्रतिबंधक अधिकाऱ्याचे लक्ष असते. परंतु दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक मालाचे उत्पादन करून ते विकले जाते. अफिमवर रासायनिक प्रक्रिया करून पांढरे म्हणजे चांगल्या प्रतीचे हेरॉईन व त्यापासून पुढे ब्राऊन शुगर बनविली जाते. चरस हे प्रामुख्याने नेपाळमधून येते तर पाकिस्तानही चरसचा पुरवठादार आहे. कोकेन मात्र आफ्रिकन देशांतून येते. दिल्लीत, मुंबईजवळ नालासोपारा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी ही मंडळी झुंडीने राहतात.