ठाणे प्रतिनिधी(दिगंबर जाधव): निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात रविवारी दि.०९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातून झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी शाब्दीक फटकेबाजी करत शिंदे गटावर जोरदार टीका केली. “आज कोजागिरी पौर्णिमा आहे. मी माझ्या सरकाराऱ्यांना विचारत होतो की, ही मंडळी सुषमा अंधारे यांच्या भाषणापर्यंतच बसणार आहे का? तर ते म्हणाले, तुम्हाला असं का वाटतं? तर मी म्हणालो, आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे आणि इथे बसणारी मंडळी ही दुध पिणारी मंडळी आहेत. मला वाटतं दसरा मेळावा झाला, तेव्हा आपण सर्व शिवतीर्थावर बसलेली मंडळी होतात, तर दुसऱ्या बाजुला बिकेसीवर गटारी साजरी करणारी मंडळी होती”, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावला. “कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी आपण दुधात चंद्र बघतो. मात्र, एकनाथ शिंदे हे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे निघाले. त्यांनी शिवसेनारुपी दुध नासवण्याचा प्रयत्न केला”, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली. दरम्यान, यावेळी भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यातील भाषणावरूनही एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ”एकीकडे उद्धव ठाकरेंच्या पाठिची शस्रक्रिया झाली असताना, ते ताठ मानेने भाषण करत होते, तर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिलेले भाषण वाचत होते, असेही ते म्हणाले.