महाराष्ट्र : महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक माजी एनएसजी कमांडोने थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रवीण कुमार तेवतिया असे या माजी सैनिकाचे नाव असून, त्यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. प्रवीण तेवतिया यांनी त्यांच्या ट्विटर एक्स वरून राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहे. “मुंबईवर हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?” तसेच, “मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं. देशाला भाषेच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करू नका,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या वक्तव्यामुळे हिंदीविरोधी वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यात ते मरीन कमांडो फोर्स (मार्कोस)च्या गणवेशात हसताना दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर ‘UP’ असे स्पष्ट लिहिलेले आहे आणि त्यांच्या हातात रायफलही दिसत आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “मी उत्तर प्रदेशचा आहे, पण मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं. ताज हॉटेल वाचवलं. २६/११ च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. त्या वेळी राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच,”देशाचे भाषेच्या आधारे विभाजन करू नका. आनंदाला आणि माणुसकीला कोणतीही भाषा लागत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. “प्रवीण तेवतिया यांनी २६/११ च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे. तेवतिया हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत किमान १५० लोकांचे प्राण वाचवले. या मोहिमेदरम्यान प्रवीण यांना गंभीर जखमा झाल्या होत्या — चार गोळ्या लागल्या, तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.







