मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून विविध भागांत पाणी साचले आहे. ऐन उन्हाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसामुळे रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरू असून नागरिकांना शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मेट्रो ३’लाही पावसाचा फटका बसला. मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. रेल्वे कोलमडल्याने आणि रस्ते जलमय झाल्याने मेट्रो ३ मधून प्रवास सुकर होईल असा मुंबईकरांना आशावाद होता. मात्र आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत बाहेर यावे लागले.
मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानक मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. मुसळधार पाऊस कोसळू लागताच वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती होऊ लागली. स्थानकात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या वरळीतील भुयारी मेट्रो स्थानक जलमय झाले असून प्रवाशांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले.





