पुणे : चाकण परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण, वाहतूक व्यवस्थापन तसेच उच्चस्तरीय समिती आणि तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बाबाजी काळे, सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चाकणच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या रोडमॅपनुसार कामाला गती देण्याचे निर्देश देत त्यांनी रस्त्यांवरील खड्डे ३१ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश दिले. वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण या प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलीस ठाण्यांची उभारणीही केली जाणार आहे. एमआयडीसीशी चर्चा करून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती देताना, चाकणमध्ये दिसणारा कचरा आणि प्लास्टिकचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पार्किंगची व्यवस्था सुधारण्यासाठी उपलब्ध जागांचा वापर करून नियोजन केले जात असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाचा एकत्रित विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकणमधील अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. कोणाचीही गय केली जाणार नाही, मात्र नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल आणि औद्योगिक परिसरातील नागरिक व उद्योजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती आराखड्याची माहिती दिली. रस्त्यांवरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार असून, प्रत्येक शुक्रवारी संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. अतिक्रमण हटविण्याची मोहीम तातडीने सुरू करून महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एमआयडीसीतील पार्किंगच्या जागा एका आठवड्यात कार्यान्वित करून रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकचे नियोजन केले जाणार आहे. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणणे, औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करणे, कचरा व्यवस्थापनासाठी १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि सर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगितले. बैठकीत उद्योजक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.






