पुणे : आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून, ती लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक अनेक दिवस पायी प्रवास करत पंढरीची वाट धरतात. या प्रदीर्घ प्रवासात त्यांच्या संपर्काचे प्रमुख साधन असलेला मोबाईल बंद पडल्यास कुटुंबीयांशी संवाद तुटण्याची चिंता निर्माण होते. ही गरज ओळखून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून पाच अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन तयार करून त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केल्या आहेत. या उपक्रमामुळे वारीदरम्यान हजारो भाविकांना मोफत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध होत आहे. युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून या चार्जिंग व्हॅन संपूर्ण वारीसोबत सातत्याने प्रवास करत असून गरजेनुसार वारकऱ्यांचे मोबाईल अल्पावधीत चार्ज करून दिले जात आहेत. प्रत्येक व्हॅनमध्ये एकाच वेळी सुमारे १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असल्याने मोठ्या संख्येने वारकऱ्यांना या सेवेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे निर्माण होणारी अडचण दूर झाली असून भाविकांना वारीदरम्यानही आपल्या कुटुंबीयांशी सहज संपर्क साधता येत आहे.
वारीदरम्यान अनेक वारकरी आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर असतात. अशा परिस्थितीत कुटुंबीयांना ‘मी सुखरूप आहे’ एवढा एक फोन करता येणेही त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरतो. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या नातेवाईकांशी सतत संपर्कात राहू शकतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता कमी होते आणि भाविकही अधिक निश्चिंतपणे वारीचा आध्यात्मिक अनुभव घेऊ शकतात. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवाभाव, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण मानली जाते. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली मोबाईल चार्जिंग व्हॅनची सेवा ही केवळ तांत्रिक सुविधा नसून वारकऱ्यांप्रती जपलेली आपुलकी आणि संवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेक भाविकांकडून स्वागत केले जात असून वारीतील हजारो यात्रेकरूंना त्याचा प्रत्यक्ष लाभ होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे वारीचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक होत असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.






