दौंड : पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ६६ हजार ८३१ क्युसेक झाला आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्चात ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. धरणात १०० टीएमसी पेक्षा अधिक एकूण पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये भीमा नदीला महापुराची भीती व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने आषाढी सोहळ्यात संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी शुक्रवार, २० जून रोजी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून भीमा नदीत वीज निर्मितीद्वारे १६०० क्युसेक तर सांडव्याद्वारे १६ दरवाजे उचलून १० हजार क्युसेक एकूण ११६०० क्युसेस ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
उजनी धरणातील एकूण साठा सध्या १०० टीएमसी इतका आहे, त्यापैकी ३६.५८ टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या पाच दिवसांतच साठ्यात ११ टीएमसीने वाढ झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत उजनी पाणलोट क्षेत्रात ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनात्मकदृष्ट्या पाहता, गेल्या वर्षी याच दिवशी (२० जून २०२४) उजनी धरणाची पाणीपातळी केवळ ४६.७१ टक्के होती. यंदा ती १० टक्क्यांनी अधिक असून, १०४ टक्के अधिक पाणीसाठा आहे, म्हणजेच सध्या धरण भरून येण्याचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.







