मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ३२ तास विस्कळीत झाली होती. वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकली होती. महामार्गावर २५-२५ किमीच्या रांगा लागल्या असतानाही त्या काळात वाहनांकडून पथकर वसूल करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वर मोठी टीका झाली होती. त्यानंतर अखेर आता अपघातानंतरच्या ३२ तासांच्या कालावधीत वसूल करण्यात आलेला पथकर वाहनधारकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर पथकराची रक्कम फास्टॅगच्या माध्यमातून वाहनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे.







