नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचे निकष स्पष्ट करताना बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना थेट भारतीय संघात प्रवेश देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. हंगामी समितीने सध्या सुरू असलेल्या कुस्ती संघटनेच्या वादावर पडदा टाकण्याचा केलेला हा एक प्रयत्न मानला जात असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. हंगामी समितीने राष्ट्रीय संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य प्रशिक्षकांचा सल्ला विचारात न घेता हा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हंगामी समितीने एक पत्रक काढून निवड चाचणी फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला अशा तीनही विभागांतील सर्व सहा वजनगटात होतील. मात्र, पुरुषांच्या ६५ किलो आणि महिलांच्या ५३ किलो वजन गटासाठी मल्ल निश्चित असल्याचे जाहीर केले.
हंगामी समितीने बजरंग आणि विनेश यांच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरी समितीमधील एक सदस्य अशोक गर्ग यांनी या दोघांनाही निवड चाचणीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. निवड चाचणीला चारच दिवस बाकी असताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या हंगामी समितीच्या या निर्णयाने सगळेच चकित झाले आहे. बजरंग आणि विनेश सध्या परदेशात प्रशिक्षण घेत असले तरी, गेल्याच आठवडय़ात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेतून दोघांनी ऐनवेळी माघार घेतली होती. ग्रिको रोमन आणि महिलांची निवड चाचणी २२ जुलै आणि पुरुषांच्या फ्री-स्टाईल गटाची चाचणी २३ जुलै रोजी होणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संगीता फोगट, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियन आणि किन्हा हे चार अन्य मल्ल निवड चाचणीत सहभागी होणार का हे देखील अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. किन्हा किर्गीझस्तानमध्ये बजरंगचा सरावातील साथीदार म्हणून गेला आहे. हंगामी समितीचे प्रमुख भुपेंदर बाजवा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, निवड समितीच्या निकषासंदर्भात कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी हंगामी समितीशी संपर्क साधावा असे स्पष्ट केले आहे.