अहिल्यानगर : बस कधी येणार? या एकाच प्रश्नासाठी प्रवाशांना वारंवार चौकशी खिडकीवर जावं लागायचं. येईल पाच मिनिटात, येईल दहा मिनिटात, बसचा वेळ झालाय येईलच आता अशा प्रकारची उत्तरं चौकशी कक्षातून दिली जायची. ही दिली जाणारी उत्तरं मोघमच असायची, कारण ती बस कुठं आहे ही समजणारी सुविधाच उपलब्ध नसायची. मात्र, काळ बदलला आणि काळानुसार ‘लालपरी’ही बदलत गेली.
विमानतळ, रेल्वे स्थानकं जशी हायटेक आणि डिजिटल होत राहिली तशी आपली लालपरीची सेवा देखील डिजिटल होत गेली. सुरुवातीच्या काळात कंडक्टरच्या खांद्याला लावलेल्या एका पिशवीत तिकीटाचा गठ्ठा ठेवलेला असायचा. त्यात एक रुपयांपासून ते 50, 100 रुपयांची तिकीट असायची. जिथं जायचं तिथपर्यंतचं तिकीट किती आहे हे पाहून ती तिकीटं फाडली जायची. मात्र, काळ बदलला आणि एसटीनं तिकीट काढायचं मशीन आणलं. कोरोनाकाळानंतर ऑनलाईन पेमेंटकडं कल वळला. एसटीनंही आपल्या प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा सुरु केली. तिकीट बुकिंगसाठी ऑनलाईन App, वेबसाईट आली, तिकीटासाठी स्मार्ट कार्ड आलं. सर्वकाही ऑनलाईन झालं. आता तर चक्क आपली एसटी कुठं आहे आणि किती वेळात ही बस स्थानकात येणार याची माहिती देखील प्रवाशांना एसटी फलाटावर लावलेल्या डिस्प्लेवर दिसणार आहे. बस स्थानकाच्या फलाटावरच बस आगमनाची अचूक आणि थेट माहिती देणारी ‘पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम’ शिर्डी बस स्थानकावर कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या आधुनिक उपक्रमामुळं प्रवाशांना वेळेचं अचूक नियोजन करता येत असून, प्रवास अधिक वेगवान झाला आहे.







