विरार : वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. शहर एका बाजूला डोंगररांग आणि दुसऱ्या बाजूला समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने मुसळधार पाऊस आणि समुद्रातील भरती एकाचवेळी आल्यास पावसाचे पाणी शहरात साचते. ही नैसर्गिक परिस्थिती असली तरी नियोजनबद्ध उपाययोजनांद्वारे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरातील पाणी साचण्याची कारणे आणि पाण्याचा प्रवाह याचा आयआयटी, व्हीजेटीआय किंवा टाटा कन्सल्टन्सीसारख्या संस्थांकडून सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानुसार भूमिगत पर्जन्य जलवाहिन्या उभारणे, नाल्यांची रुंदी व खोली वाढविणे, नवीन नाले तयार करणे आणि ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते तेथे मुंबईतील हिंदमाता, सायन गांधी मार्केट व मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत पाणी साठवणूक टाक्या उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याशिवाय भरतीच्या काळात पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी समुद्रकिनारी शक्तिशाली पंपिंग स्टेशन उभारणे, नाल्यांची लांबी समुद्रापर्यंत वाढविणे आणि समुद्रात कचरा जाणार नाही यासाठी ट्रॅशबूम बसविण्याचाही प्रस्ताव आहे. पूरप्रवण भाग निश्चित करून त्या ठिकाणी स्वतंत्र नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. वसई-विरार शहर २०१८ मध्येही अशाच प्रकारे जलमय झाले होते. त्यावेळी तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पर्जन्य जलवाहिन्यांचा अभाव, भराव तसेच शहरातील काही भाग मिठागरांच्या पातळीपेक्षा सखल असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे नमूद केले होते. आयआयटी आणि निरीच्या तज्ज्ञांची समिती नेमून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा अभ्यास करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्या समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या उपाययोजना तातडीने आवश्यक :
१. साठणाऱ्या पाण्याचा अभ्यास करणे
२. नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे
३. नवीन नाले निर्माण करणे
४. नवीन भूमिगत जलवाहिन्या टाकणे
५. भूमिगत साठवणूक टाकी
६. मुंबईच्या धर्तीवर शक्तिशाली पंप
७. नाल्यांची लांबी समुद्रापर्यंत वाढवणे
८. कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी ट्रॅशबूम बसविणे
९. पूरसदृश्य ठिकाण निश्चित करणे
१०. मुंबई मनपाने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमणे






