मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार,” असे ठामपणे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, “जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौराच्या शक्यतेवरून लागली, तितकी मिरची ‘बुरखेवाली महापौर बनेल’ या शक्यतेची का लागली नाही?” यावरून त्यांनी ठाकरे गट हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राणे पुढे म्हणाले की, “यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते.” मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, मुंबईवर केवळ मराठी आणि हिंदूचाच अधिकार असेल. “मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच (महायुतीचा) होणार!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







