वृत्तसंस्था : भारतीय संघाने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि त्यासह त्यांनी आशिया कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १७२ धावांत आटोपला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कुलदीप यादवने यावेळी चार विकेट्स घेत विजयात पुन्हा मोलाचा वाटा उचलला.
भारताचे २१४ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण भारताच्या गोलंदाजांनी हे आव्हान श्रीलंकेसाठी कठीण करून ठेवले. कारण जसप्रीत बुमराने सुरुवातीला भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला एकामागून एक धक्के दिले. बुमराने प्रथम श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांकाला सहा धावांवर बाद केले. त्यानंतर बुमराने भारताला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली ती कुशल मेंडिसची. कारण मेंडिस सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि तो एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्वाची होती. बुमराने यावेळी मेंडिसला सूर्याकरवी झेल बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजने दिमुथ करुणारत्नेला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला.
कुलदीप यादव हा गेल्या सामन्यात चांगल्या लयीत होता. यावेळीही त्याने चांगली गोलंदाजी केली. खासकरून या सामन्यात त्याने सदीरा समरविक्रमाला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहण्यासारखे होते. कारण सदीरा चांगली फटकेबाजी करत होता. त्यावेळी कुलदीप आणि लोकेश राहुल यांनी सदीरासाठी एक रणनिती आखली. त्यानुसार सदीराला कुलदीपने मोठा फटका मारण्यासाठी आमंत्रित केले आणि लोकेश राहुलने हातात चेंडू आल्यावर त्याला यष्टीचीत करण्याचे काम चोख बजावले. त्यानंतर कुलदीपने चरिथ असालंकालाही बाद केले. श्रीलंकेचा अर्धा संघ यावेळी ७३ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद केले आणि भारताला अजून एक मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे श्रीलंकेची ६ बाद ९९ अशी स्थिती झाली होती. भारत तिथून लवकर सामना जिंकेल, असे वाटत होते. पण यावेळी भारताच्या विजयाचा मार्गात मुख्य अडथळा बनला होता तो धनंजय डिसिल्व्हा. यावेळी धनंजयला चांगली साथ देत होता तो दुनिथ वेलालागे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली आणि त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण जडेजाने यावेळी धनंजयला ४१ धावांवर बाद केले आणि ही जोडी फोडली. जडेजाच्या विकेटनंतर हा सामना भारताच्या बाजूने झुकला आणि त्यांनी विजय साकारला.