मुंबई : मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे काल विसर्जन पार पडले. मात्र, लालबागच्या राजाचे तब्बल ३३ तासांनंतर विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आला. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला.
मात्र, लालबागचा राजा विसर्जनाला उशीर का झाला?
लालबागचा राजा विसर्जनाला उशीर होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटीवर येण्यास उशीर झाला होता. लालबाग राजा हा सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटी येथे आला. त्यावेळी ओहोटीची वेळ निघून गेली होती आणि उंच उंच लाटा उसळताना समुद्रात पाहायला मिळत होत्या.
भरती ओहोटीची वेळ लालबाग राजा मंडळाकडून पाळण्यात आली नाही, तशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं नाही. दुसरं कारण ज्यामुळे लालबाग राजाचं विसर्जन वेळेत होऊ शकलं नाही आणि विसर्जन रखडलं. सकाळी ५.१६ वाजता कमी भरती म्हणजे ओहोटीची वेळ होती, त्यामुळं सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान लालबाग राजाचे विसर्जन शक्य झालं असतं आणि सहज लालबागचा राजा हा ट्रॉलीतून नव्या तरफ्यात आणून पुढे त्याचं विसर्जन करता आलं असतं. वेळेत लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचू न शकल्याने आणि साडेसात वाजता आल्याने खवळलेल्या समुद्रात आणि भरतीच्या वेळ जवळ आल्याने लालबाग राजाची गणेश मूर्ती ही ट्रॉलीमध्येच राहिली. लालबाग राजाची मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर आणता येत नव्हती कारण ज्या ठिकाणी लालबाग राजा गिरगाव चौपाटीवर आला त्या ठिकाणी उंच उंच समुद्राच्या लाटा उसळत होत्या आणि लालबाग राजाची गणेश मूर्ती अर्धी पाण्यात होती. सकाळी ११.४४ वाजता ४.४३ मिटर उंचीच्या समुद्राच्या लाटा उसळत होत्या कारण की भरतीची वेळ होती. त्यामुळे लालबाग राजा मंडळाला विसर्जनासाठी जोपर्यंत पाणी कमी होत नाही आणि खवळलेला समुद्र शांत होत नाही तोपर्यंत थांबावं लागणार होतं.
विसर्जनासाठी आजूबाजूला असलेल्या बोटी सुद्धा भरतीची वेळ असताना पुन्हा एकदा किनाऱ्यावर लागल्या होत्या. त्यामुळं लाटा कमी होण्यासाठी भरतीची वेळ निघून कमी भरतीची म्हणजे ओहोटीची वेळेची सायंकाळी सहा वाजता वाट पहावी लागली. साधारणपणे संध्याकाळी सात साडे सातच्या दरम्यान ट्रॉलीतून लालबाग राजाची मूर्ती तराफ्यात ठेवून आठ-साडेआठच्या दरम्यान तराफा हा समुद्राच्या आतमध्ये निघाला. अत्याधुनिक यंत्रणा असलेला हा नव्याने आणलेला ताराफ्यातून लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली आणि त्यानंतर तब्बल ३३ तासानंतर लालबाग राजाचे विसर्जन झालं. भरती ओहोटीची वेळ न पाळल्याने, योग्य नियोजन त्यानुसार न झाल्याने आणि लालबाग राजा हा गिरगाव चौपाटीवर उशिरा दाखल झाल्याने साधारणपणे १२ ते १४ तास उशिराने लालबाग राजाचे विसर्जन यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच झाले.







