पुणे : पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला १०४ हेक्टर जागेची आवश्यकता असून याबद्दल प्रशासनाने याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारला सादर केला आहे. या सहा नवीन बोगद्यांमुळे द्रुतगती मार्गावर दिवसाला दीड लाख वाहने धावणार असून यामुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होणार आहे.
पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. मात्र पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी यामुळे ‘एमएसआरडीसी’ प्रशासनाने या मार्गावर मार्गिकेची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचा अहवाल तयार करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. मार्गिका वाढवताना सहा ठिकाणी सहा नवीन बोगदे केले जाणार आहेत. यासाठी १०४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन केले जाणार आहे. पुणे ते मुंबई दरम्यान खंडाळामध्ये १, कामशेतमध्ये २, भाटणमध्ये १, आडोशीमध्ये १, माडपमध्ये १ असे एकूण ६ बोगदे बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मार्गावरून दररोज दीड लाख वाहने धावतील. येत्या काळात पुण्यात विविध रस्ते प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. हे लक्षात घेत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मार्गिकेत देखील वाढ केली जाणार आहे. सध्या ६ मार्गिका असून यात आणखी चार मार्गिकांची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या दररोज सुमारे ७० ते ८० हजार वाहने धावतात, मात्र चार मार्गिका वाढल्यावर दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतील असा अंदाज आहे.






