मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या आदेशावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच औरंगाबादच्या सभेत आपण मोदी-शहांचे हस्तक आहोत असे जाहीरपणे सांगितले आहे. नुकतेच ते दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुजरा करायला गेले. दिल्लीला विचारल्याशिवाय यांचे पानही हलू शकत नाही, राज्यकारभार करणे तर दुरचीच गोष्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
वर्षभरापासून अनेक विभागांना मंत्री नाहीत, एका-एका मंत्र्यांकडे सहा-सात खात्यांचा कारभार दिला आहे. त्यामुळे एक मंत्री कोणत्याच विभागाला न्याय देऊ शकत नाहीत. सहा-सहा जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री आहे, त्यामुळे राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. प्रशासन ठप्प झाल्यामुळे कामकाज होत नाही, आणि सामान्य जनता त्रस्त झाली आहे. लोकांची कामे होत नाहीत पण शिंदे-फडणवीस सरकारला त्याची चिंता नाही, सरकार बेफिकीर आहे असा आरोपही पटोले यांनी केला.
राज्यात आज अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, शेतकरी हवालदिल आहे, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. पण शिंदे सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. मोठ-मोठ्या घोषणा करायच्या आणि केवळ इव्हेंटबाजी करुन जनतेच्या पैशांची लुट करण्याचे काम सुरु आहे. राज्यातील जनता शिंदे-फडणवीस सरकारला कंटाळली असून आगामी निवडणुकीत जनता त्यांना घरीच बसवण्याचे काम करेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.