मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे–ठाकरे गटाचे जागावाटप आधीच निश्चित झाले होते. मात्र दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील काही प्रभागांवरून अद्याप तिढा कायम होता. सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा तिढा अखेर सुटला. या बैठकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २०३, २०४ आणि २०५ यांच्या जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असल्याची माहिती आहे. मातोश्रीवर झालेल्या चर्चेअखेर शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी आणि एक प्रभाग मनसेसाठी सोडण्यात आला आहे. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चर्चा करून शिवडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या भांडूप , विक्रोळी, दादर आणि माहिम या भागातील प्रभागांच्या जागावाटपाची चर्चा झाली. सुरूवातील विक्रोळी आणि भांडूपमधील प्रभाग क्रमांक १०९, ११०, ११४, ११५ या चार जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला. तर दादर, माहीममधील वार्ड क्रमांक १९२, १९४, १९३ या तीन प्रभागांवरही दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. यासंदर्भात करण्यात विशाखा राऊत आणि अनिल देसाई यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाली. याशिवाय आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय दिना पाटील हे बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा करत आहेत. आज दिवसभरात जागावाटप अंतिम करून मनसे आणि ठाकरे गटाकडून युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान (गोरेगाव) आणि वरळी डोम या तीन ठिकाणांची चाचपणी सुरू असून, यापैकी एका ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील इतर महानगरपालिकांमधील जागावाटपाबाबतच्या चर्चा देखील अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.







