मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करून बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांनी यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये फेरीवाल्यांची खरोखरच झाडाझडती घेवून त्यांना हटवले जाते की प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी हे कारवाईची नौटंकी करत महापौरांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवतात हे येत्या काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे.
मुंबईतील वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांसंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती. याबैठकीला भाजपचे नेते किरीट सोमय्यांसह इतरही भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवनिर्वाचित महापौरांनी, मुंबईत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांची आधार कार्ड इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढवण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. गेल्या काही वर्षात मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या आणि त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांचा आर्थिक ताण वाढण्यासोबतच काही भागात महिलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. फुटपाथवरील गर्दी, अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा समस्या निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यासोबतच विविध प्रभागांमध्ये कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.







