ठाणे : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आणि गावकर्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या कालावधीत ४३१ ग्रामपंचायत परिसरातील ३ हजार २६१ सार्वजनिक जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षातून दोन वेळा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.
जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायती मधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सार्वजनिक स्त्रोतांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर या सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. या सर्वेक्षणाच्या निकषांनुसार तसेच स्त्रोतांच्या जोखिमेनुसार वर्गीकरण करून व ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरित करण्यात आहे.