नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांच्या पुढाकारानं पाटणा येथे काल विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील प्रमुख १५ पक्षांचे नेते उपस्थितहोते. या बैठकीत विरोधी पक्षांचनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. यावेळी नितीश कुमार यांनी आम्ही एकजूट होऊन लढलो तर भाजपला १५० जागांवर रोखू शकतो, असं म्हटलं. यावेळी भाजपकडे त्यांनी केवळ ३७ टक्के मतं असल्याचा दावा केला. आता विरोधी पक्षांची पुढील बैठक १२ जुलै रोजी शिमला येथे होणार आहे. त्या बैठकीपूर्वी २००४ चा फॉर्म्युला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरला जाईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
काँग्रेस २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००४ चा सोनिया गांधी यांनी बनवलेला फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं फेब्रुवारीमध्ये रायपूरमध्ये झालेल्या ८५ व्या अधिवेशनात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २००४ चा फॉर्म्युला राबवण्याबाबत चर्चा केली होती. काँग्रेसनं त्यावेळी सत्ताधारी एनडीएचा सामना करण्यासाठी पाच राज्यांमध्ये विचारधारा समान असलेल्या घटक पक्षांसोबत आघाडी केली होती. काँग्रेसनं त्यावेळी ६ प्रादेशिक पक्षांशी आघाडी केली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये टीआएस, तामिळनाडूमध्ये डीएमके, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि बिहारमध्ये राजद आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत आघाडी केली होती. काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होता. काँग्रेसनं २००४ च्या लोकसभेत ४१७ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी १४५ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी भाजपनं ३६४ जागा लढवल्या होत्या. त्यांचे १३८ उमेदवार विजयी झाले होते. तर, त्यावेळी काँग्रेसनं ज्या १८८ जागांवर घटक पक्षांशी आघाडी केली होती, तिथं यूपीएला ११४ जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या ६१ आणि मित्रपक्षांच्या ५६ जागांचा समावेश होता. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यानंतर डाव्या पक्षांना ५९, समाजवादी पार्टीला ३५ आणि बसपाला १९ जागांवर विजय मिळाला होता. तर एनडीएतील इतर पक्षांच्या खात्यात ७४ जागा गेल्या होत्या. दरम्यान, विरोधी पक्षांची पुढील बैठक हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासीत राज्यात होणार आहे. तिथं २००४ च्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.