पुणे : शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असे आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. मात्र मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात त्या एकहाती सत्ता आणतात. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आपल्या राजकीय जीवनात आपल्याच राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, अशी खोचक टीका शरद पवार यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू नेते दिलीप वळसे पाटील यांनी करून मोठी खळबळ निर्माण केली आहे.
वळसे पाटलांच्या या वक्तव्याने व्यथित झालेल्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटलांवर सडकून टीका केली आहे. साहेबांचा सर्वांत विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांविषयी तुमचे हे विचार महाराष्ट्र विसरणार नाही, क्षमा करणार नाही, आंबेगावसुद्धा तुम्हाला धडा शिकवेल, वळसे पाटील तर त्यांच्या बाजूच्या मतदारसंघात देखील पक्षाचा एखादा आमदार निवडून आणू शकले नाहीत अशी टीका आव्हाडांनी ट्विट करत केली आहे. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांश नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांनी गेल्या अनेक वर्षात अनेकांना मोठे केले. नव नवीन नेतृत्व तयार केले यात दिलीप वळसे पाटील हे देखील आहेत. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्या चमूमध्ये झाले. अजित पवार गटात गेल्यानंतर आता वळसे पाटील यांनी पवार यांच्यावरच टीका केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे