मुंबई : नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण मुंबई शहरातील विविध प्रशासकीय वॉर्डांमध्ये राबविण्यात येणार असून, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृती कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सहभागातून विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देणे, पर्यावरण संवर्धनाला चालना देणे आणि समाजात निस्वार्थ सेवाभावाची भावना अधिक दृढ करणे हा आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी विविध वॉर्डांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘डी’ वॉर्ड कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात जसलोक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबिराचा परिसरातील ४५ नागरिकांनी लाभ घेतला. अनेक नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारचे उपक्रम वारंवार आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
याच अभियानाचा भाग म्हणून ‘ई’ वॉर्डमधील घोडपदेव येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा आरोग्य विभाग, घोडपदेव सार्वजनिक मंडळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश देतानाच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामुळे अभियानातील सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी सुरुवात झाली असून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याचबरोबर ‘ए’ वॉर्डच्या वतीने फोर्ट परिसरातील शहीद भगतसिंग मार्गावर राजपुष्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ताम्हण’च्या दोन वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्या हस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरात हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रशासनाच्या मते, ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ सरकारी उपक्रम नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून समाजोपयोगी कार्याची चळवळ बनविण्याचा प्रयत्न आहे. आगामी एक महिन्याच्या कालावधीत विविध वॉर्डांमध्ये अशाच प्रकारचे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक सेवा आणि जनजागृतीविषयक अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभागी होऊन निरोगी, हरित आणि जबाबदार मुंबई घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






