नागपूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, वाहन तपासणी, विशेष तपास मोहीम आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ड्युटीवर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस आयुक्तांनी गुरुवारी जारी केले. शहरात वाहन तपासणीदरम्यान अनेकदा गुन्हेगार, संशयित व्यक्ती किंवा वाहतुकीचे नियम मोडणारे नागरिक पोलिसांच्या कारवाईला विरोध करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण आणि जीवघेण्या हल्ल्यांचाही सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना स्वतःचे संरक्षण करता यावे आणि आवश्यकतेनुसार तातडीने प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मते, वाहतूक पोलीस केवळ वाहतूक नियंत्रणाचे काम करत नाहीत, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपाचा विचार करून त्यांना आवश्यक सुरक्षा साधनांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. या आदेशानुसार शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग आणि विशेष तपासणी नाक्यांवर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांकडे ड्युटीदरम्यान सर्व्हिस गन असणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीदरम्यान स्वच्छ व नीटनेटका गणवेश परिधान करणे, शिस्तबद्ध वर्तन ठेवणे आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व्हिस गन अनिवार्य करण्याचा निर्णय घेत, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, शहरातील डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही कर्तव्यावर असताना सर्व्हिस गन बाळगण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, संघटित गुन्हेगारी आणि वाढती आव्हाने लक्षात घेता पोलीस दलाला प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज ठेवणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे वाहतूक पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, तसेच कर्तव्य बजावताना त्यांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर कायदा मोडणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवरही या निर्णयाचा प्रतिबंधात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.






