रायगड : आंबेनळी घाट पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. पोलादपूर तालुक्यातील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या चुलत मावशीची हत्या करून तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनंदा लक्ष्मण पाटील (वय ८५, रा. सारळ आदिवासीवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) आणि रितेश नरेश लोहार (वय २०), दोघेही रा. तिनवीरा, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत मुख्य संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून मृतदेह फेकण्यात आलेले ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले आहे.
या घटनेनंतर अलिबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आंबेनळी घाटातील अतिशय खोल आणि धोकादायक दरीमुळे मृतदेह बाहेर काढणे मोठे आव्हान होते. यासाठी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. त्यांनी विशेष खबरदारी घेत धाडसी बचावमोहीम राबवून मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हत्येचे प्रकरण समोर आल्याने हा परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वीही याच भागात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे आंबेनळी घाटातील हा परिसर पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






