मुंबई : ‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, दिल्लीसोबत पंगा घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही., असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. आज राज्यात नवं सरकार स्थापन होणार असून राज्याला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यंत्रिमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय सांगतो असे म्हणले होते. यावरून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सांगितले की, ‘एकनाथ शिंदे १०० टक्के उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यात अजिबात नाही. आज तिघे शपथ घेतील. बाकीच्या शपथविधीला अनेक वेळ जाईल.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत यावर प्रतिक्रिया द्यावं असं काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले., असे मत त्यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपादाच्या रेकॉर्डवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ‘सलग ६ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन. एक प्रकारे उपमुख्यमंत्रिपदाच आरक्षण त्यांच्यासाठी ठेवलं आहे असं म्हणता येईल. त्यासाठी अनेकांचं योगदान आहे. उत्तम सहकार्य म्हणून अजित पवार यांनी काम केलं. उध्दव ठाकरे देखील अजित पवार यांचं नेहमी कौतुक करतात. तसंच, अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळून घेतलं आहे. त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पुढील ५ वर्ष राज्यात धुमशान बघायला मिळेल.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.





