अमरावती : अमरावती जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २६९० वाहनांची तपासणी करण्यात आली असून HSRP नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई करून ₹८७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जुन्या वाहनांवर HSRP बसविण्यासाठी शासनाने पाच वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही अनेक वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसविण्यात आलेली नसल्याचे तपासणीत आढळले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, शहर आणि जिल्ह्यात सहा भरारी पथके सातत्याने तपासणी करत असून नियमभंग करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे तत्काळ कारवाई केली जात आहे. HSRP तातडीने बसवून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही वाहनधारकांना करण्यात आले असून ही मोहीम पुढील काळात अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली सुमारे ३.८४ लाख वाहने अद्याप HSRP शिवाय असल्याची माहिती RTOने दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ७.५ लाख वाहनांसाठी HSRP अनिवार्य करण्यात आली असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ₹१,००० दंड आकारला जात आहे. याशिवाय HSRP बसविल्याशिवाय पत्ता बदल, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण यांसारखी RTOची महत्त्वाची कामेही बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी करूनही अधिकृत केंद्रावर आलेल्या नंबर प्लेट वेळेत बसवून घेतलेल्या नाहीत. काही ठिकाणी प्लेट १५ दिवसांहून अधिक काळ केंद्रावर पडून असल्याचेही समोर आले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र आता मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने नियमांची सक्तीने अंमलबजावणी सुरू करत दंडात्मक कारवाईला वेग दिला आहे.






