मुंबई : लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले. ईकेवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविल्यानंतरही अनेक महिलांना ईकेवायसी करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या ईकेवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. ज्या महिलांचे ईकेवायसी अद्यापही झालेले नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे ईकेवायसी अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे सध्या अडीच कोटी लाभार्थी आहेत. दरमहिन्याला या महिलांच्या खात्यात १५०० रुपये सरकारकडून जमा केले जातात. मात्र ईकेवायसीची अट टाकल्यामुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसी न केल्यास या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. सुरुवातील १८ नोव्हेंबरची असलेली मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असली तरी अद्यापही लाखो महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. कधी मोबाईल अधारशी संलग्न नाही तर कधी ओटीपीच येत नसल्याने महिलांना ईकेवायसीत अडचण येत आहे. अशा महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत केली जाणार आहे. या अंगणवाडी सेविका ईकेवायसी न झालेल्या महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांचे कागदपत्र गोळा करणार आहेत व स्वत: ईकेवायसी करून देणार आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ओटीपीची येणारी अट दूर होणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे पती व वडील दोघेही हयात नाहीत अशांसाठी संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आले आहेत. या महिलांनी संबंधित मृत्यूदाखले अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करावयाचे आहेत. त्यानंतर त्यांचे ईकेवायसी पूर्ण होणार आहे.







