मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्याच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ (Maharashtra Next) नावाचे एक नवीन डिजिटल व्यासपीठ त्यांनी जनतेला अर्पण केले. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपात न अडकता, सामान्य नागरिकांच्या विकासविषयक कल्पना थेट सरकारपर्यंत पोहोचवणारा एक सक्षम दुवा म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. राज ठाकरे यांच्या मते, महाराष्ट्रातील नागरिकांकडे राज्याच्या प्रगतीसाठी अनेक उत्तम योजना आहेत, पण त्या मांडायच्या कोणाकडे, हा मोठा प्रश्न होता. म्हणूनच ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
- शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा, आणि पर्यटन यांसारख्या २७ महत्त्वाच्या क्षेत्रांत नागरिक आपल्या सूचना नोंदवू शकतात.
- वेबसाईटवर येणाऱ्या प्रत्येक संकल्पनेची आधी तज्ज्ञांमार्फत छाननी केली जाईल. जर तुमची कल्पना योग्य असेल, तर ती प्रत्यक्ष राबवण्यासाठी मनसे सरकारकडे पाठपुरावा करेल.
- ही वेबसाईट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असून, ती कशी वापरावी यासाठी एक मार्गदर्शन ऑडिओ फिल्मही तिथे देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी तरुणांना खडे बोल सुनावले. “तुम्हाला मोबाईल आणि इन्स्टाग्रामसारख्या करमणुकीच्या ‘गटारगंगेत’ गुंतवून ठेवलं जात आहे, जेणेकरून तुम्ही सरकारला प्रश्न विचारू नये,” अशी टीका त्यांनी केली. केवळ ‘भावी मुख्यमंत्री’ किंवा ‘जय महाराष्ट्र’ अशा कमेंट्स करण्यापेक्षा ठोस विकासकामांवर विचार करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात २ लाख कोटींचे असलेले कर्ज आता ११ लाख कोटींवर गेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शहरं कोलमडून पडली आहेत, शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत आणि तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केंद्राच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताला वर्षानुवर्षे मदत करणाऱ्या इराणच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. इंधन संकट आणि वाढती महागाई आगामी काळात मोठी आव्हाने निर्माण करू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.







