नवी मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना अनेक लोक जिवाला मुकतात. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वेच्या वतीने रेल्वे रुळांवर पादचारी पुलांचीही उभारणी केली गेली आहे. मात्र, अनेक प्रवासी वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक करत असतात. त्यामुळे प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, म्हणून रेल्वे रुळालगत लोखंडी जाळ्या आणि सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम हार्बर रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर इथून पुढे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रकाराला आळा बसेल. हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके मुंबई आणि इतर रेल्वे स्थानकांपेक्षा वेगळी आहेत. इथल्या रेल्वे स्थानकात कुठेही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नाहीत. शिवाय स्थानकात दोन्ही दिशेला उतरण्याची सुविधा आहे. त्यामुळे इतर स्थानकांप्रमाणे इथे प्रवाशांची गर्दी होत नाही.
मात्र, याठिकाणी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार होत असतात. रेल्वे आली की प्रवासी उतरून, रेल्वे स्थानकाबाहेर जाण्यासाठी जिन्यांचा नाही तर रेल्वे रुळांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बऱ्याच वेळा रेल्वे बदलून प्रवास करायचा असल्यास बहुतांश प्रवासी रेल्वे रूळ ओलांडूनच रेल्वे पकडतात. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी हार्बर रेल्वेने या चोरवाटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी स्थानकापासून बेलापूर रेल्वे स्थानकात सध्या रेल्वे फलाटावर बाहेरून येण्या-जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. इथे पूर्वी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आता सिमेंटच्या संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. रेल्वेच्या सुरुवातीच्या फलाटाकडे आणि शेवटच्या फलाटाकडे दोन्ही दिशेला या संरक्षण भिंती उभारल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता जिने चढूनच दुसऱ्या फलाटावर किंवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडता येणार आहे.