पुणे : पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत असून, आजमितीला पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे १५० च्या वर टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
पुणे शहर जिल्ह्यासह पुणे विभागात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाहीलाही झाली. त्यातच हवामान खात्याने येत्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान उन्हाच्या झळांसोबतच विभागातील अनेक धरणे, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, तर अनेक ग्रामपंचायतींवर ‘हंडा मोर्चा’ निघत आहेत. उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे. गावातील तलाव पूर्ण कोरडे पडल्याने गावाशेजारील विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी महिला भरतात. ही परिस्थिती अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी ७ तालुक्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात आंबेगाव तालुक्यातील १९ गावात १९ टँकरने, भोर तालुक्यातील २ गावात २ टँकरने, हवेली तालुक्यातील २ गावात २ टँकरने, जुन्नर तालुक्यातील १५ गावात १३ टँकरने, खेड तालुक्यातील १० गावात ९ टँकरने, पुरंदर तालुक्यातील १७ गावात १७ टँकरने, शिरूर तालुक्यातील ३ गावात ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई मुळे जिल्ह्यातील ६८ गावांमधील ४६२ वाड्या बाधित झाल्या असून, १ लाख १८ हजार ८४३ नागरिकांची तहान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भागवली जात आहे. शहराच्या कानाकोफऱ्यात पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. अनेक जलवाहिन्यांद्वारे पाणी येण्यास अडथळा येत आहे. तसेच जलवाहिन्याअसून देखिल पाणी येत नाही. जलवाहिन्यांचे कनेक्शन तसेच वॉल दुरुस्ती केली जाते. परंतु शहरातील जलवाहिन्यांचे नकाशेच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.







