नवी मुंबई : ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होण्याच्या प्रकरणांत प्रचंड वाढ झाली असून सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती नवी मुंबईत गेल्या वर्षी करण्यात आली. नवी मुंबईत पोलिसांना २०२३ हे वर्ष संमिश्र गेले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद जास्त झाली असली तरी गुन्हे उकल टक्केवारीत आठ टक्क्यांनी प्रगती आहे. सन २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ५ हजार ८११ विविध गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर ३ हजार ७८४ गुन्ह्यांची उकल झाली होती. २०२३ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६ हजार १२८ गुन्ह्यांची नोंद, तर ४ हजार ४८० गुन्हे उकल करण्यात आले. २०२२ च्या तुलनेत २३ मध्ये गुन्ह्यांची नोंद जास्त असली तरी २०२२ मध्ये एकूण ६५ टक्के गुन्हेउकल झाली, तर यंदा हेच प्रमाण ७३ टक्के झाले आहे. आतापर्यंतचा सायबर पोलीस ठाण्याचा आढावा घेतला असता इतर पोलीस आयुक्तालयांच्या तुलनेत चांगली कामगिरी सुरू आहे.
शहरात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल नऊने वाढ झाली असून २०२२ मध्ये नऊ जणांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०२३ मध्ये २३ जणांनी स्वत: होऊन आपले जीवन संपवले. महिला अत्याचारात किंचित घट झाली असून २०२२ मध्ये ६८८ घटनांची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये ६८१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच वाहतूक व्यवस्था, सायबर गुन्हेगारी आणि अमली पदार्थविरोधी कठोर कारवाईचे मनसुबे स्पष्ट केले होते. त्यानुसार ११ मे २०२३ ला आयुक्तालय क्षेत्रातील पहिले सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. हे पोलीस ठाणे सुरू होताच सायबर गुन्ह्यांची उकल होणे सुरू झाले. त्यात सेक्सोर्शन, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, इतर ऑनलाइन फसवणूक आदी गुन्ह्यांची उकल होणे सुरू झाले. यासाठी सायबर विषयात उत्सुक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
३१ डिसेंबर २०२२ ला अमली पदार्थविरोधी कारवाई करताना वर्षाचा शेवट व नवीन वर्षाची सुरुवात करताना नायजेरियन टोळीच पकडण्यात आली. यात पाच महिलांचा समावेश होता. या कारवाईने नवीन आलेल्या आयुक्तांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. तसेच नुकतेच गेल्या आठवड्यात खोपोलीनजीक एमडी हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करतानद्पाच लोकांना अटक करीत लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. याशिवाय हुक्का पार्लर, अवैध मद्या विक्री, फिरस्तीप्रमाणे मद्या विक्री करणारे अशा लोकांवरही कडक कारवाई केली गेली. नवी मुंबई पोलीस विभागात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. कारण पोलीस विभागातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. २०२३ मध्ये नवी मुंबई पोलीस क्षेत्रात सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे सायबर पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे.