मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत मोठा राजकीय दावा केला आहे. मोदी हे २०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, “मी ज्याला साथ देतो तोच सत्तेत येतो. त्यामुळे मी सरकारचा भाग बनतो आणि विरोधक सत्तेबाहेर राहतात.” यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि धोरणांचा उल्लेख करत सध्याचे सरकार कोणताही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असल्याचा दावा केला. गरीब, दलित, मागासवर्गीय आणि वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत आठवले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केल्याचा दावा केला. पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याण योजनांमुळे देशाच्या विकासाला गती मिळाल्याचे ते म्हणाले. या कामगिरीमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास कायम असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळातही केंद्र सरकारची धोरणे देशाला अधिक सक्षम बनवतील, असा विश्वास व्यक्त केला. भारत जागतिक स्तरावर प्रभावी आणि सक्षम शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आठवले म्हणाले की, “दररोज टीका करण्यात तज्ज्ञ झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.” आगामी निवडणुकांनंतरही विरोधकांची स्थिती फारशी बदलणार नसल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेतून बाहेर जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.







