कोल्हापूर : महावितरणच्या स्मार्ट मीटरला नागरिकांचा प्रचंड विरोध आहेत. मात्र, खासगी कंपनीने काहीही करून स्मार्ट मीटर बसविण्याचा चंगच बांधला आहे. कोल्हापूर शहरात स्मार्ट मीटर नाकारणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठाच बंद करण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे महावितरणच्या ‘प्रकाशगडा’वरून आलेल्या हा तोंडी आदेश स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना डोकेदुखी बनला आहे.
महावितरणच्या स्मार्ट मीटरला राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. मीटरची किंमत, दर्जा आणि वाढीव येणारे वीज बिल अशा तक्रारींचा पाढा वाचत नागरिकांनी वारंवार आंदोलने केली आहेत. त्यामुळे महावितरणने प्रथम स्वत:ची यंत्रणा त्यानंतर सरकारी कार्यालये, फॉल्टी मीटर असे टप्प्याटप्प्याने मीटर बसविण्याचा धडाका सुरू केला आहे. तरीही नागरिकांचा विरोध मावळत नाही. खासगी कंपनीचे कर्मचारी मीटर बसविण्यास येताच नागरिकांतून तीव विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने आता महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या कामासाठी तगादा लावला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या कामास विरोध दर्शविला असला, तरी अधिकाऱ्यांच्या दबावामुळे काही ठिकाणी हे काम सुरू केले आहे. आता प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत अधिकाऱ्याने तोंडी फतवा काढून स्मार्ट मीटर बसविण्याचा फंडा अधिक तीव केला आहे. या फतव्यामुळे स्थानिक अधिकारी मात्र हतबल झाले आहेत. आदेशाचे पालन करावे, तर नागरिकांचा रोष आहे, नाही करावे तर वरिष्ठ प्रशासनाचा रोष अशा कात्रित स्थानिक अधिकारी सापडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.







