मुंबई : दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन हवेत विरले आहे. शहर भागातील रस्त्याच्या कामांना आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांना अलीकडेच सुरुवात झाली असून उपनगरांतील कामेही कूर्मगतीने सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील केवळ ३० टक्के कामे झाली आहेत. मुंबईतील दोन हजार किमी रस्त्यांचे गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. यापैकी पन्नास टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प शिंदे यांनी २०२२ मध्ये सोडला होता व पालिका प्रशासनाला तसे निर्देश दिले होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील तब्बल ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करून जानेवारी २०२३ मध्ये कार्यादेश देण्यात आले. मात्र शहर भागातील रस्त्यांची कामे ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील कामांची गती कमी आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्या टप्प्यातील ४०० किमी रस्त्यांपैकी केवळ ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. एकीकडे ही स्थिती असताना दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठीही निविदा मागवून ऑगस्ट २०२४ मध्ये कार्यादेश देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ३९२ किलोमीटर लांबी रस्त्यांची कामे अर्धवट असताना दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणही ऑक्टोबरपासून सुरू झाले. मात्र ही कामे एकाचवेळी सुरू असल्यामुळे वाहतूक पोलिसांची परवानगी, उपयोगिता वाहिन्या सरकवणे, रस्ते बांधणीपूर्वीची पर्जन्यजलवाहिन्यांची कामे यामुळे वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पहिल्या टप्प्यातील कामांचा कालावधी २०२६ पर्यंत होता. तर दुसऱ्या टप्प्यातील कामांचा कालावधी २०२८पर्यंत आहे. मात्र पहिला टप्पा २०२५ पर्यंत व दुसरा टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘सांगितले. रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कमी होत असून पावसाळ्यात मुंबईकरांना बदल नक्कीच दिसेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. त्यासाठी दररोज किमान एक किमीचा रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून कंत्राटदारांनाही सूचना दिल्या आहेत. दर आठवड्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. गेल्या वर्षी ज्या रस्त्यांवर खड्डे होते ते रस्ते प्राधान्याने हाती घेतले जाणार असल्याचे बांगर म्हणाले.





