मुंबई : मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून मागील ४ दिवसात तीन पोलिसांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी तिन्ही आत्महत्यांचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त होत आहे. शनिवार सशस्त्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मुकेश देव (४५) हे मरोळच्या सशस्त्र पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. ते अंधेरी पूर्वेच्या आगरकर बस आगाराजवळ असलेल्या पोलीस वसाहतीत रहात होते. शनिवारी सर्वत्र दहिहंडीचा उत्सव सुरू होता. देव आपल्या घरात एकटेच होते. संध्याकाळी ४ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. देव यांना पुढील उपचारासाठी जुहूच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आत्महत्या करण्याची ही ७ दिवसातील तिसरी घटना आहे. बुधवारी १३ ऑगस्ट रोजी कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातील गणेश राऊळ (३२) या पोलिसाने नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सुरवातीला त्यांचा मृत्यू रुळ ओलांडताना झाला असे वाटले होते. मात्र नंतर सीसीटीव्ही तपासले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
दुसरी आत्महत्या भाईंदर मध्ये झाली. गुरूवार १४ ऑगस्ट रोजी भाईंदर मध्ये राहणार्या ऋतिक चौहान (२५) या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २०२३ मध्ये तो पोलीस दलात रुजू झाला होता. ऋतिक त्याच्या आईसह भाईंदरच्या बेकरी गल्लीत असलेल्या अभिनव इमारतीत भाडेतत्वावर रहात होता. आई गावी गेल्यावर ऋतिकने पंख्याला नायलॉन दोरी अडकवून आत्महत्या केली. तिसरी आत्महत्या शनिवारी अंधेरीत राहणाऱ्या मुकेश देव (४५) या पोलिसाने केली. या तिघा पोलिसांनी आत्महत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या या वाढत्या आत्महत्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात २०२० ते जून २०२५ या चार वर्षांच्या काळात मुंबई पोलीस दलातील एकूण ४२७ पोलिसांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला झाल्याची माहिती दिली. त्यापैकी २५ पोलिसांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.







