नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नोटिसा पाठवणे, पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावणे आणि त्यांचे जबाब नोंदविणे असे प्रकार देशभरात सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार तसेच विविध भाजपशासित राज्य सरकारांना कठोर इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचा छळ आणि दबाव टाकण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा पक्ष पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे करेल, असा इशारा त्यांनी दिला. देशभर विद्यार्थी आंदोलनाची तीव्रता वाढलेली असताना मुंबईसह अनेक शहरांमध्येही मोठी आंदोलने झाली होती. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे किंवा चौकशीसाठी बोलावले जात असल्याचा आरोप सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे. हजारो विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सरकारसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास कॉकरोच जनता पार्टी लवकरच मोठे आणि शांततापूर्ण आंदोलन उभारेल, असा इशारा देत सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांची जाणीवपूर्वक कोंडी करणे त्वरित थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशातील ‘निर्देश क्रमांक ४’ मुळे सरकारांना विद्यमान एफआयआरवरील पुढील कार्यवाही आणि तपास सुरू ठेवण्याची मुभा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, हा आदेश केंद्र सरकारने २५ जुलै २०२६ रोजी देशातील तरुणांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात आहे. त्या वेळी आंदोलनाशी संबंधित सर्व एफआयआर मागे घेण्याचे आणि कोणत्याही आंदोलकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते, अशी आठवणही त्यांनी सरकारला करून दिली. आंदोलन मागे घेताना सीजेपीने विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची आणि नवीन गुन्हे दाखल न करण्याची मागणी केली होती. पक्षाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यानंतरही काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले जात असल्याच्या तक्रारी पक्षाकडे येत असल्याने अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत विद्यार्थ्यांवरील कारवाई तातडीने थांबवावी, अन्यथा व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली.






