मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह’ भूमिगत बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ झाला असून, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवासवेळ निम्म्यावर येणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र तो जून २०२८ पर्यंत म्हणजे सहा महिने आधीच पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. जवळपास ७०० इमारती, शेकडो वर्षांपूर्वीच्या हेरिटेज वास्तू आणि मेट्रो-३ च्या ५० मीटर खालून जाणारा हा बोगदा खणण्याची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो (एल अँन्ड टी) या नामांकित कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी टनेल बोरिंग मशीनचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “पूर्व मुक्त मार्गामुळे पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत २० ते २५ मिनिटांत पोहोचता येते. पण पुढच्या प्रवासात वाहतूक कोंडीत अर्धा-पाऊण तास जातो. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी प्रचंड वळसा घालावा लागतो. या दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ‘ऑरेंज गेट टनेल’ची संकल्पना आकाराला आली.” ते पुढे म्हणाले, “या भागात फ्लायओव्हर उभारणे अशक्य होते. मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही जास्त दाटीवाटीच्या भागातून बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा मध्य व पश्चिम रेल्वे मार्गांच्या खालून, १०० वर्षे जुन्या हेरिटेज इमारतींच्या खालून आणि मेट्रो-३ च्या ५० मीटर खाली जाणार असल्याने हा प्रकल्प खरंच एक ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरणार आहे.”
प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
- एकूण लांबी : ९.९६ किमी (यापैकी सुमारे ७ किमी भुयारी मार्ग)
- अंदाजित खर्च : ₹८,०५६ कोटी
- पूर्णत्वाचा कालावधी : ५४ महिने (जून २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट)
- दोन्ही बोगद्यांत : ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते + १ आपत्कालीन लेन
- कमाल वेग : ८० किमी/तास
- सुरक्षा : दर ३०० मीटरला क्रॉस पॅसेज, आधुनिक ITS, अग्निशमन यंत्रणा, यांत्रिक वायुवीक्षण







