नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडताना दिसत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विविध वृत्तांनुसार, या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र सादर केले असून, त्यानंतर त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री दिल्लीतील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, संबंधित खासदार तसेच कायदेविषयक सल्लागार उपस्थित होते. संभाव्य पक्षांतरानंतर कोणत्याही प्रकारची अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी आणि घटनात्मक प्रक्रियेचे पालन करण्यासाठी कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रक्रियेदरम्यान अत्यंत सावध भूमिका घेत अंतिम रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडूनही या घडामोडींना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त असून काही नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
या संभाव्य राजकीय बदलामुळे लोकसभेतील शिवसेनेच्या संख्याबळावर मोठा परिणाम होऊ शकतो. सहा खासदार शिंदे गटात सामील झाल्यास त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील बळ लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) त्यांच्या पक्षाचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी ही मोठी राजकीय धक्का मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्षाने आपल्या खासदारांना एकत्र ठेवण्यासाठी बैठका घेतल्या, तर काही नेत्यांनी फूट रोखण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले. मात्र, स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. अद्याप या प्रक्रियेबाबत अंतिम अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, सहा खासदारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या घडामोडींचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित न राहता राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.







