रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र गणपतीपुळे, पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील एका तरुण पर्यटकाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली. तीन मित्र समुद्रात गेले असताना एकाच बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश मिळालं आहे. स्थानिक जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आलं. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा मुंबईचा रहिवासी होता. तर, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार हे दोघे बचावले आहेत.
प्रफुल्ल त्रिमुखी, सिद्धेश काजवे, भीमराज आगाळे, विवेक शेलार आणि अन्य दोन मित्र असे एकूण पाच कॉलेजचे मित्र देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून गणपतीपुळे येथे आले होते. सकाळी गणपतीपुळ्याला पोहोचल्यानंतर त्यांनी एका खासगी निवासस्थानात मुक्काम केला होता. दुपारनंतर या तरुणांनी एकत्र समुद्रात मज्जा करण्याचा बेत आखला आणि ते समुद्रात उतरले. सायंकाळपर्यंत त्यांची मज्ज मस्ती सुरू होती. प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तिघांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडाले. इतर मित्रांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेले मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक, जीवरक्षक, पोलीस आणि ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढलं मात्र तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. दोघांची प्रकृती बिघडली होती.







