ठाणे : लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलिस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे. निवडणूक गुन्हेगारी आणि भयमुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील ७७३ जणांकडील रिव्हॉल्वर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमीनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनातच कल्याण शिंदे शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात किती जणांना रिव्हॉल्वर दिलं आहे, याची चर्चा सुरु झाली. कल्याण पोलिस परिमंडळाच्या हद्दीत १ हजार ३८५ जणांकडे अग्नीशस्त्र आहे. त्यांनी पोलिस परवानगी घेऊन रिव्हॉल्वर बाळगले आहे. १६ मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी १ हजार ३८५ जणांपैकी ७७३ जणांकडील अग्नीशस्त्र निवडणूक काळापूरते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अग्निशस्त्रे जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, २०१९ साली कल्याण पोलिस परिमंडळाने ५२४ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा २०२४ सालच्या लोकसभा निवडणूकीकरीता १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ११९ जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या विविध स्वरूपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.