मुंबई : बेस्ट ही मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला गेल्या काही वर्षापासून उतरती कळा लागलेली आहे. आर्थिक अडचणीमुळे बेस्टने स्वमालकीच्या बस खरेदी करण्याऐवजी भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला बेस्टच्या जास्त भाडेतत्वावरील आहे. या भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरुस्तीपासून ते चालकांच्या वेतनापर्यंत सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न., अडचणी, समस्या आहेत.
जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ या १५ महिन्यात भाडेतत्वावरील बसचे १४६ अपघात झाले असून त्यात २८ मुंबईकरांचा मुत्यु झाला आहे. तर६२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या अपघातामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वपुर्ण भूमिका असलेल्या बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील बसचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या ४ वर्षांत अपघात केल्या प्रकरणी बेस्टच्या ५० चालकांना निलंबन आणि अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील दोन्ही चालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुर्ला पश्चिमेला रात्रीच्या वेळी बेस्टच्या कंत्राटी बसचा अपघात झाला होता. त्या अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. त्या अपघातानंतर कंत्राटी चालकांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भाडेतत्वावरील बसचे चालक हे कंत्राटी आहेत. हे चालक गाड्या भरधाव चालवतात अशी तक्रार प्रवासी वारंवार करतात. परंतु त्याकडे बेस्ट प्रशासनाने देखील सहज दुर्लक्ष केले आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने आपला खर्च मोठ्या प्रमाणात कपात करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करताना बेस्टने आपल्या बसवरील खर्चही कमी केला. बेस्ट प्रशासनाकडून होत असलेल्या आर्थिक काटकसरीचा परिणाम बेस्टवर आणि प्रवाशांवरही होत आहे.







