पुणे : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर; तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ व खान्देशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली; तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात करण्यात आले आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग किंचित मंदावल्याने गेल्या २४ तासांपासून ते तळकोकणात मुक्कामी आहेत. हे वारे संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. त्यामुळे मोठा पाऊस पुढील आठवड्यानंतरच राज्यात दिसेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागरात आगेकूच केली. हे वारे आता मिझोराम, मणिपूर, नागालँड ही राज्ये, याशिवाय त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग व्यापत आहेत. महाराष्ट्रात मात्र मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत बदल झालेला नाही. वाऱ्यांची उत्तरेची सीमा देवगडमधून जात आहे. पुढील तीन-चार दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात इतर ठिकाणी आगेकूच करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढच्या तीन-चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांत तुरळक ठिकाणी, तर किनारी भागांत अनेक ठिकाणी पावसामध्ये हळूहळू वाढ होत जाईल. तीन-चार दिवसांत किनारी भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर, मध्य महाराष्ट्र; तसेच मराठवाड्याच्या काही भागात पारा चाळीस अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यात रात्री किमान तापमान २६ ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा पुढील दोन दिवस ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात मध्यम ते जास्त पावसाचा ‘यलो ॲलर्ट’, तर रायगड, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागांत सोसाट्याचा वारा वाहून विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ इशारा देण्यात आला आहे.







