नवी मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मागण्यांची दखल घेत मध्य रेल्वेच्या १० प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली आणि कर्जत या विस्तृत उपनगरी मार्गावर सुमारे ९० स्थानके असतानाही केवळ काही ठिकाणीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेक प्रसंगी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जीव गमवावा लागत असल्याने हा गंभीर मुद्दा समोर आला होता. यावर सातत्याने पाठपुरावा करत पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
या निर्णयानुसार कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, ठाणे, मुंब्रा, टिटवाळा आणि कर्जत अशा महत्त्वाच्या स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वैद्यकीय सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. या कक्षांमध्ये ऑक्सिजन, स्ट्रेचर, आवश्यक औषधे, प्राथमिक उपचार पेट्या आणि बेसिक लाईफ सपोर्ट प्रणाली उपलब्ध असेल. याशिवाय स्टेशन मास्टर, टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचीही योजना आहे. यापूर्वी मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर येथे असलेल्या सुविधा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती; मात्र या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा सुरक्षा बळकट होणार आहे. भविष्यात सर्व स्थानकांवर अशा सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू राहणार असून, प्रत्येक स्थानकाबाहेर रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. या उपक्रमामुळे लाखो प्रवाशांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होऊन मुंबई लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे.







