वसई : राज्य शासनाने अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य केल्यानंतर व त्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर वसई परिसरात एक नवा उपक्रम सुरू झाला आहे. मराठी भाषा शिकून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांवर “हो, मी मराठी शिकलो… मी मराठी बोलतो” असा संदेश असलेल्या पाट्या लावण्यास सुरुवात केली आहे. या पाट्यांमुळे प्रवाशांना मराठी भाषा बोलणारे चालक सहज ओळखता येणार असून अशा चालकांच्या रिक्षांना प्राधान्य देण्याची संधीही मिळणार आहे. राज्य सरकारने सुरुवातीला अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत दिली होती. त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३२ जिल्ह्यांत विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातही तालुकानिहाय प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. या शिबिरांद्वारे तब्बल ११ हजार ६४० अमराठी रिक्षाचालकांनी मराठीचे प्राथमिक ज्ञान आत्मसात केले आणि परिवहन विभागाकडून अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्रही मिळवले. मात्र, काही चालक प्रशिक्षण पूर्ण करू शकले नाहीत किंवा परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी शासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही ठिकाणी याच मुद्द्यावरून आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर मराठी शिकलेल्या चालकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रिक्षांवर विशेष संदेशफलक लावण्यास सुरुवात केली आहे. “हो, मी मराठी शिकलो… मी मराठी बोलतो” असा संदेश असलेल्या या पाट्यांमुळे प्रवाशांना मराठी भाषेत सहज संवाद साधणारे चालक ओळखणे सोपे होणार आहे. वसईतील एका रिक्षाचालकाने सांगितले की, “माझा उद्देश कोणाच्याही रोजगारावर परिणाम करणे नाही. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत मी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचावी म्हणून मी ही पाटी लावली आहे.” यापूर्वी परिवहन विभागाने मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर काही अमराठी चालकांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी बोलणाऱ्या चालकांच्या रिक्षांवर “मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा” अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या. आता शासनाच्या मुदतवाढीनंतर मराठी शिकलेल्या चालकांनी स्वखुशीने अशा संदेशफलकांचा वापर सुरू केल्याने प्रवाशांमध्येही या उपक्रमाची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.






