मुंबई : राज्य सरकारने सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील बैठक, प्रशिक्षण कार्यक्रम, परिषद तसेच उपाहारगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्पोपहार आणि भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी बैठकींमध्ये चहा, बटाटेवडे, बिस्किटे, नानकटाई आणि तेलकट किंवा अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांऐवजी आरोग्यदायी व पौष्टिक आहार देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सरकारी कार्यक्रमांमध्ये चहा-कॉफीसह बटाटेवडे, बिस्किटे आणि गोड पदार्थ दिले जात होते. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा मेन्यू बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन धोरणानुसार हंगामी फळे, केळी, सफरचंद, पेरू, पपई, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, नाचणी, ज्वारी आणि बाजरीच्या भाकऱ्या, विविध भाज्या, डाळी, उसळी आणि कोशिंबीर यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी आणि ताक यांसारख्या आरोग्यदायी पेयांनाही प्राधान्य दिले जाईल. स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देत संतुलित आहाराची सवय लागावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
याशिवाय सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांच्या नवीन खानपान (केटरिंग) करारांमध्ये आरोग्यदायी मेन्यूचा समावेश करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित विभागांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पौष्टिक आहाराविषयी जनजागृती करावी, तसेच संतुलित आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जाणार आहे. मंत्रालयातील उपाहारगृहात या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, तेथे फळे, उकडलेली अंडी, कडधान्ये, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच जेवणात डाळ, उसळ, पालेभाज्या, पुलाव, कोशिंबीर आणि ताक यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये आरोग्यदायी आहार संस्कृतीला चालना मिळण्याबरोबरच तेलकट आणि कमी पोषक खाद्यपदार्थांचे सेवन कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.





