मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ६३ व्या वर्षी एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय घेतला आहे. २२ ऑगस्ट रोजी बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा उंच आणि भव्य गणेशमूर्तीची परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते यंदा केवळ विधिवत पूजेसाठी लहान गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पूजेची मूर्ती नेहमीप्रमाणे ११ दिवस मंडपात विराजमान राहणार असून तिचे आगमन आणि विसर्जनही अत्यंत साध्या आणि शांत वातावरणात पार पडणार आहे. मंडळाने यावर्षी कोणतीही भव्य मिरवणूक किंवा उंच मूर्ती न आणता उत्सव श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत साजरा करण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी मानवी जीविताला सर्वोच्च प्राधान्य देत मंडळाने घेतलेल्या भूमिकेचे अनेक स्तरांतून स्वागत केले जात आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेत मंडळाने यंदासाठी साकारलेली २२ फूट उंच आकर्षक गणेशमूर्ती भायखळ्यातून मिरवणुकीसह भुलेश्वरकडे आणली जात होती. मुख्य मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असताना अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती कोसळली. या भीषण अपघातात मंडळाचे ३३ वर्षीय अध्यक्ष संकेत नेवशे आणि ३० वर्षीय पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ५ आणि ७ वर्षांच्या दोन चिमुरड्यांसह एकूण पाच जण जखमी झाले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती.
या प्रकरणाचा तपास एल. टी. मार्ग पोलीस करत असून अपघातामागील कारणांचा सखोल शोध सुरू आहे. तपासादरम्यान मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातून मूर्ती बाहेर काढल्यानंतर अवघ्या १५० मीटर अंतरावर तिच्या पाठीमागील लोखंडी सांगाड्याचे वेल्डिंग तुटल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात नेऊन घाईघाईने वेल्डिंगचे काम करण्यात आले आणि त्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात लोखंडी सांगाड्याचे वेल्डिंग कमकुवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच कारणामुळे पुढे मिरवणुकीदरम्यान वेल्डिंग तुटून मूर्तीचा तोल गेला आणि ही मोठी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्षातून समोर आले आहे. या घटनेनंतर सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये उभारल्या जाणाऱ्या महाकाय मूर्तींची सुरक्षितता, त्यांच्या लोखंडी सांगाड्यांची गुणवत्ता, वेल्डिंगची तपासणी आणि मिरवणुकीदरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा निकष लागू करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, भुलेश्वरचा राजा मंडळाने घेतलेला साधेपणाचा निर्णय हा केवळ परंपरेत बदल नसून दुर्घटनेत गमावलेल्या सहकाऱ्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली मानली जात आहे.





