मुंबई : शुक्रवारी (२५ एप्रिल) मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या ब्रिजच्या तोडकामाला आज (२६ एप्रिल) पासून सुरवात होणार होती. मात्र एल्फिन्स्टन ब्रिजच्या तोडकामाला २ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली आहे. सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात येईल असं एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तोडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय समोर आल्यानंतर यासंदर्भात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांणी तूर्तास आंदोलन मागे घेतलं आहे.
काल, शुक्रवार २५ एप्रिलला एमएमआरडीएने एल्फिन्स्टन ब्रीज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र येथील स्थानिक रहिवाश्यांकडून या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या निर्णयाला २ दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे. पुढचे दोन दिवस म्हणजे सोमवार पर्यंत हा ब्रिज सुरु राहणार असल्याचे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं आहे. सोमवारी यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन ब्रीजच्या पाडकामला आजपासून करण्यात येणार होती. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मोठे जेसीबी दाखल झाले होते, पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. ब्रिजचा डिव्हायर तोडण्याचंही काम सुरु झालं होत. मात्र प्रभादेवी-परळमधील स्थानिक नागरीक ब्रिज बंद करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. काल रात्री उशिरा पर्यंत त्यांचं आंदोलन सुरु होत. रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक बाधित होणार आहेत, त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यात येत आहे. काल रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर कालिदास कोळंबकर यांनी हा निर्णय दोन दिवसांसाठी स्थगित करणार येणार असल्याचे सांगितले. दोन दिवसानंतर सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन तूर्तास थांबवले आहे. आता दोन दिवसांनी बैठकीत काय निर्णय होईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.







